Translate

शुक्रवार, 11 अप्रैल 2014

संस्कृत-पंडित हा शब्द काय आहे

श्रीपाद अभ्यंकर sanskrit2601@gmail.com लिहीतात -- 
विचार असा मनात येतोय की, माणूस संस्कृत-पंडित होतो म्हणजे त्याचं संस्कृतचं ज्ञान सर्वसमावेशक होतं कां ? आपण इंग्रजी-पंडित म्हणतो कां, हिंदी-पंडित म्हणतो कां ? जर तसं म्हणत नाही, तर संस्कृत-पंडित कशाला म्हणायचं ?
सर्वसमावेशक ज्ञान अशा दृष्टीनं विचार करताना असं लक्षात येतं की, जगातल्या कुठल्याही विषयातील माहिती संस्कृतमधून व संस्कृतमध्ये उपलब्ध व्हावी हें काम संस्कृत-पंडिताला करता आलं पाहिजे. आज इंग्रजीत जगातल्या कुठल्याही विषयातील माहिती उपलब्ध होते. 

संस्कृत भाषा ही समर्थ भाषा आहे, असं जर म्हणायचं, तर भाषेच्या समर्थतेचा एक निकष सर्वसमावेशक ज्ञानाची उपलब्धता हा देखील असतो. संस्कृतभाषा अशी समर्थ असायची तर तीत सर्वसमावेशक ज्ञान उपलब्ध असायला हवं. संस्कृत पंडिताला कसे करून देता यायला हवे. थोडक्यांत, पांडित्य हे भाषेनुसार असण्यापेक्षा विषयानुसार असतं, किंबहुना तें तसंच असायला हवं. काळाचीही तीच गरज आहे. 

गेल्या वर्षी इथे गोरेगांवात श्री. धनंजय देशपांडे, निवृत्त न्यायाधीश, मुंबई यांचं "वेदांतील विज्ञान" अशा विषयावर भाषण झालं होतं. तशी त्यांची पुस्तके देखील आहेत, मराठीत आणि इंग्रजीत. वेदांचा हा असा अभ्यास हा एकदम काळाशी सुसंगत आहे. 
हा सर्व विचार मनात आल्यावर थोडीफार कल्पनाही मनात रुजतेय कीं संस्कृतमध्ये मला इथून पुढे काम करताना कोणत्या दिशेने काम करतां येईल. 
------------------------------------------------------
माझे उत्तर --  इंग्रजी शिक्षण पद्धतीमधे आपण ते तसं म्हणायला शिकतो -- इंग्लिश घेऊन किंवा हिंदी घेऊन एम ए झालेले आपण पहातोच ना -- भाषेवर प्रभुत्व (हे वर्णन तरी किती योग्य ?) या अर्थाने संस्कृत पंडित हा शब्द वापरला जाऊ शकतो, पण तुमचा मुद्दा बव्हंशी योग्य आहे.
संस्कृत भाषेतून आतापर्यंत केलेल्या ग्रंथरचनांमधे विभिन्न विषयांचे ज्ञान तसे खूप आहे पण भाषाविदांच्या आणि त्या त्या विषयांच्या पंडितांच्या अभावामुळे पकडीत येत नाही. ते आणता यावे याबाबत हेतुपूर्वक प्रयत्नांची गरज आहे उदा चाणक्याचे अर्थशास्त्र समजायचे असेल तर अशी व्यक्ति हवी जिने संस्कृतसोबत अर्थशास्त्राचाही गाढा अभ्यास केलेला आहे. ही एक मोठी कमतरता आपल्या शिक्षणांत आहे.
तिसरा मुद्दा -- भाषा समर्थ रहाण्यासाठी फक्त पूर्वसंचित पुरेसे नाही तर नवी ग्रंथरचनाही होणे आवश्यक. ते आज संस्कृत तर सोडाच पण बोलचालीतील भारतीय भाषांमधे सुद्धा अभावानेच होत आहे. -- हा तर खूप गंभीर प्रश्न आहे त्या सर्वांच्याच अस्तित्वाबद्दल. 
असो - मी मराठीतून संगणकाची जादुई दुनिया असे शास्त्रीय पुस्तक लिहिले आहे. तुम्हाला पटल्यास त्याच्या संस्कृत संस्करणाचा प्रयत्न करता येईल. 
--------------------------------------------------------------

मंगलवार, 1 अप्रैल 2014

नागार्जुन आणि जादूचा चौरस


संस्कृत पंडित श्रीपाद अभ्यंकर लिहितात --
सर्गश्च प्रतिसर्गश्च वंशो मन्वन्तराणि च । वंशानुचरितं चैव पुराणं पञ्चलक्षणम् ॥
या श्लोकावरून सिद्ध होते कि आपली पुराणे ही मानववंशशास्त्रातील धडेच आहेत. त्यांना मुद्दाम मिथक -- मिथ्या असे संबोधन देण्यांत आले कारण ते करणाऱ्या ब्रिटिशांसमोर ग्रीक मिथकांचे उदाहरण होते. त्याचबरोबर त्यांचे गांभीर्य काढून घेण्यासाठीही याचा उपयोग झाला.
माझ्या मते अँथ्रोपोलॉजीच्या विद्यार्थ्यांसाठी भारतीय वंशशास्त्र असा एक विषय असला पाहिजे.

--------------------------------------------------------------------------------
अरविंद कोल्हटकर यांच्या ब्लॉगवरील एक गणिती श्लोकाची पोस्ट
इन्द्रो वायुर्यमश्चैव नैऋतो मध्यमस्तथा।
ईशानश्च कुबेरश्च अग्निर्वरुण एव च॥
मूळ माहीत नसलेल्या आणि काही देवांच्या नावांची केवळ यादी वाटावी अशा स्वरूपाच्या ह्या श्लोकामध्ये एक मजेदार गणित दडलेले आहे.
श्लोकामधील देव हे आठ दिशांचे राखणदार असे अष्टदिक्पाल आहेत. त्यांच्या सोबत मध्यम असा कोणी कल्पिला आहे.
सर्वप्रथम वायव्य दिशेपासून सुरुवात करून आठ दिशा घडयाळाच्या काटयांच्या दिशेने आणि तिनातिनाचा ओळींमध्ये लिहा:
वायव्य उत्तर ईशान्य
पश्चिम (मध्यम) पूर्व
नैऋत्य दक्षिण आग्नेय
आता प्रत्येक दिशेच्या जागी तिच्या दिक्पालाचे नाव लिहा:
वायु कुबेर ईशान
वरुण (मध्यम) इन्द्र
नैऋत यम अग्नि
आता प्रत्येक देवाच्या नावाच्या जागी वरील श्लोकामधील त्याची क्रमसंख्या लिहा. ह्या क्रमसंख्या अशा आहेत:
इन्द्रो(१) वायु(२) यम(३) नैऋतो(४) मध्यम(५) स्तथा।
ईशान(६) कुबेर(७) अग्नि(८) वरुण(९) एव च॥
२ ७ ६
९ ५ १
४ ३ ८
संख्यांची ही मांडणी म्हणजे तिसर्‍या पातळीचा आणि ’१५’ बेरीज असलेला मॅजिक स्क्वेअर आहे. ह्याच्या उभ्या-आडव्या ओळी आणि दोन्ही कर्णांमधील आकडयांची बेरीज १५ आहे.
-----------------------------------------------------------------------

त्याच ब्लॉगवरील अजून एक पोस्ट --
अरविंद कोल्हटकर http://www.aisiakshare.com/node/1979
मला असे वाटते की हा श्लोक बहुधा एका मोठया पुस्तकाचा एक भाग असावा. पुस्तक आता पूर्ण विस्मृतीत गेल्यासारखे वाटते, केवळ त्यातील हा एकच श्लोक स्मरणमात्र उरला आहे.
ह्या श्लोकात त्याच्या अन्तर्भूत अर्थाविषयी काहीच सूचना नाही. त्यामध्ये कोणतेहि क्रियापद वा अन्य प्रकारचे शब्द नाहीत, आहे ती केवळ काही देवांच्या नावाची यादी. ह्यावरून असे वाटते की कोठल्यातरी अज्ञात गणितविषयक पुस्तकात 'जादूच्या चौरसां'च्या (Magic Squares) विवरणाच्या ओघात हा श्लोक आला असावा आणि पुस्तक हरवल्यानंतर स्मृतिरूपात केवळ हा श्लोक उरला असावा.
हिंदु गणितामध्ये अशा चौरसांचे उल्लेख नागार्जुनाच्या काळापासून (इ.स. पहिले शतक?) सापडतात. जादूटोणा, गूढविद्येचा एक प्रकार अशा दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले जाई आणि 'यन्त्रां'मध्ये त्यांचे चित्रण केले जाई असे दिसते. वराहमिहिराने त्यांचा उल्लेख केला आहे आणि १३५६ सालात लिहिल्या गेलेल्या नारायणकृत 'गणितकौमुदी' नावाच्या ग्रंथात एक संपूर्ण भाग त्यांच्या विस्तृत अभ्यासाला दिला आहे.
खजुराहो मंदिरांमध्ये असलेल्या पार्श्वनाथ मंदिरात (१२वे शतक) 'चौतीस यन्त्र' नावाचा 'जादूचा चौरस' शिलालेख स्वरूपात आहे. त्याचे विकिपीडियावरून घेतलेले हे चित्रः
ह्याचे वाचनः
७ १२ १ १४
२ १३ ८ ११
१६ ३ १० ५
९ ६ १५ ४